ईश्वरशोध कुसुमाग्रजांचा!

डॉ. घन:श्याम बोरकर - लोकसत्ता 


ऐन तारुण्यात जरी कुसुमाग्रजांनी परमेश्वराचे अस्तित्व मानले नाही, तरी जसजसे विश्वातील गूढ प्रश्न मनाला जाणवू लागले, जसजसे ऐहिक पाश तुटत गेले, जसजसा एकाकीपणा वाढू लागला, तसतशी कुसुमाग्रजांच्या मनात आस्तिकता पसरू लागली. माणसाच्या जीवनातील आणि निसर्गातीलही ईश्वराच्या सौंदर्यमय आणि प्रेममय अस्तित्वाचा सुगंध त्यांच्या अंत:करणात परमळू लागला. कुसुमाग्रजांना अंतिमत: मनोमन प्रतीत झाले की, ‘माणसाची आस्तिकता ही अखेरत: त्याच्या सौंदर्यशोधनाचा एक आविष्कार आहे. न मानण्यापेक्षा मानण्याचे सौंदर्य  निखालस अधिक आहे.’ वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज. माणसातील माणुसकीचे आणि ईश्वरतेचे आपल्या साहित्यातून अखंड पूजन करणारा एक महान कवी. निराशेच्या अंध:कारात आशेच्या उल्का पेरून, तेजाचे स्फुल्लिंग चेतविणारा एक महान ऋत्विज. माणसाला ईश्वराच्या हवाली न करता माणसाच्याच मनात ईश्वरता जागविणारा एक महर्षी आर्य कवी. मराठी सारस्वताला आपल्या प्रतिभेच्या आणि प्रज्ञेच्या मंगलमय किरणांचा आल्हाददायक प्रकाश देणाऱ्या कुसुमाग्रज या महाकवीचे हे जन्मशताब्दी वर्ष!
ईश्वर नामक या विश्वाचा स्वामी खरेच अस्तित्वात आहे का? असल्यास या विश्वाच्या आणि माणसाच्याही नियतीचे नियंत्रण खरोखरीच हा ईश्वर करीत असेल का? माणूसच नश्वर आहे, तर मग त्याच्या कर्तृत्वाला आणि स्मरणालाही खरेच काय अर्थ आहे? या असीम जीवनात माणसाच्या जीवनाचे उद्दिष्ट काय? या सगळ्या निर्थक पसाऱ्यात माणसाच्या जीवनाला काही प्रयोजन असते का? आणि असले तर ते कोणते? अशा अनेक गूढ, गहन प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न कुसुमाग्रजांचे चिंतनशील कवीमन करीत होते.
मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर लोकमान्य टिळक पुण्याला आले. त्यावेळी रोज संध्याकाळी लकडी पुलावरून फिरायला जाण्याचा त्यांचा परिपाठ होता. १७-१८ वर्षांचे तरुण जे. कृष्णमूर्ती एकदा त्यांच्याबरोबर फिरायला गेले होते. चालता चालता त्यांनी विचारले, ‘टिळकमहाराज, देशासाठी स्वातंत्र्यप्राप्ती हेच तुमच्या जीवनाचे अंतिम प्रयोजन आहे का?’ लोकमान्य लगेचच उत्तरले, ‘स्वातंत्र्यप्राप्ती हे एक तत्कालिक प्रयोजन आहे. पण कुठल्याही माणसाच्या जीवनाचे अंतिम प्रयोजन हे एकमेव असते आणि असायला हवे.. ते म्हणजे ईश्वरशोध आणि ईश्वरप्राप्ती!’
जीवनातील मूलगर्भी, तलस्पर्शी आणि तत्त्वदर्शी असे विचार, मनन आणि चिंतन करणाऱ्या कुसुमाग्रजांनाही या ईश्वराचा शोध घ्यावासा वाटला, यात काहीच नवल नाही.
१९३२ पासून- म्हणजे वयाच्या २० व्या वर्षांपासून कुसुमाग्रजांचा हा ईश्वरशोधाचा प्रवास सुरू झाला. त्यांच्या तर्कनिष्ठ बुद्धीला निरीश्वरवाद पटतो, तर सौंदर्यवेडय़ा, प्रेमशील मनाला ईश्वराचे अस्तित्व जाणवत राहते. या दोन विचारधारांत त्यांचे मन सतत आंदोलित होत राहते आणि ईश्वराविषयी ते आयुष्यभर निश्चित अशी अनिश्चित भूमिका घेत राहतात. विचार, तर्क आणि भावना यांच्या संघर्षांतून आणि संयमातूनही आस्तिकता व नास्तिकता यांच्यामध्ये दोलायमान होणारा कुसुमाग्रजांचा ईश्वरशोध त्यांच्याच कवितांतून पाहण्यासारखा आहे.
‘देवाच्या दारी’ ही कविता कुसुमाग्रजांनी १९३२ ते १९३९ या सात वर्षांत तीन भागांत लिहिली. ३२ साली ते देवाला सांगतात-
‘नाम तुझे गाती   गाती थोर सान
दारी तुझ्या दीन   दान घेती।।
चिखलात येता   मूल माखोनिया
प्रेमे न्हाऊ तया   घालतोसी।।
उधळीत आज   भक्तीचीच फुले
डोळे तुझे ओले   करीन मी।।’
१९३७ साली ते त्याच देवाला विचारतात-
‘चिमण्यांच्या घरा   लावसी मशाल
केवढी विशाल   दया तुझी?
तुझ्या महिम्याची   प्रचंड पुराणे
गमती तराणे   अर्थहीन’
आणि १९३९ साली कुसुमाग्रज देवाला ठणकावून बजावतात-
‘आणि आज मन   शंकित हे होई
आहेस की नाही   मुळात तू।।
भित्या भावनेला   शोधायसी धीर
पाषाणास थोर   मीच केले।।
माझ्या जीवनाचा   मीच शिलेदार
व्यर्थ हा पुकार   तुझ्या दारी।।
आहेस की नाही   आज नसे चिंता
दोहोंमध्ये आता   भेद नुरे।।
आस्तिकता आणि नास्तिकता या परस्परविरोधी जाणिवांमध्ये कुसुमाग्रजांचे मन सतत घोटाळत राहते. वर्तमान जीवनात वास्तवात वाटय़ाला येणारी विफलता, माणसांची दीनवाणी आणि दारुण स्थिती अनुभवताना ‘ईश्वर जर अस्तित्वात असता तर आहे हे असे राहिले नसते,’ अशा नास्तिक भूमिकेवर कुसुमाग्रज येतात. ईश्वराचा धिक्कार करावा, त्याला पूर्णत: नाकारावे, अशा विचारांच्या ऊर्मीचा मेंदूत उद्रेक होतो. परंतु गतानुगतिक, परंपरागत संस्कारांनी भारलेले मन त्या ऊर्मीचा स्वीकार करीत नाही आणि कुसुमाग्रज त्यांच्या ‘जोगीण’ कवितेत म्हणतात-
‘मला हवी आहे नास्तिकता,
पण सहस्र वर्षे
मनाला मिठी घालून बसलेली
ही आस्तिकता होत नाही दूर
माझ्यापासून..’
दैनंदिन जीवनात सभोवार दिसणारे दारिद्य््रा, दैन्य, दलितांचे दु:ख, अनाथांवरील, अबलांवरील अन्याय हे सर्व पाहत असताना कुसुमाग्रजांच्या अनुभवविश्वावर त्याचा खोलवर परिणाम होत राहतो. आणि हे जर सर्व खरे असेल तर सर्व धर्माचा मध्याधार असा परमेश्वर या पृथ्वीच्या मातीत पुरला गेला असला पाहिजे, या विचारांवर ते स्थिर होतात. नास्तिकतेची श्रद्धा नव्याने त्यांच्या मनात पल्लवित होते आणि ‘याच मातीतून’ कवितेत ते म्हणतात-
‘पण याच, जागेवरच्या मातीतून, आता उगवतोय
एक लखलखित अंजिरी कोंब
नव्या ईश्वरतेचा,
जिचे पर्यायी नाव, नास्तिकताही असू शकेल.’
परंतु तरीही अजाणत्या आणि जाणत्याही वयात त्यांच्यावर झालेल्या संस्कारांमुळे क्वचित ईश्वराचे मूर्तिरूप त्यांच्या मन:चक्षूंपुढे येत राहते. नकळत देवापुढे हातही जोडावेसे वाटतात. जगावर नियंत्रण करणाऱ्या त्या शक्तीचे निराकार रूप माणसाचे मन पाहू शकत नाही; परंतु त्या शक्तीचेच आकाररूप म्हणून कुसुमाग्रज ईश्वराला पाहू लागतात. स्वत:च्याच या द्विधा मन:स्थितीची ते मग टिंगलही उडवतात. ‘मार्जिन’ कवितेत ते म्हणतात- 
‘अचेतनाला करी सचेतन, शून्याला दे अर्थाचे धन
मन अपुल्या नजरेने जीवन सदा पाहते-
म्हणून माझ्या डोळ्यापुढती
किरीटधारी रूप प्रभुचे (मंदिरातले, तसबिरीतले)
उभे राहाते.
असो तसे पण-
ईश्वर नाही या प्रश्नावर- अपुले जमते.’
शिक्षणामुळे, आजूबाजूला समाजात घडणाऱ्या विसंगत, वैफल्यग्रस्त घटनांमुळे, अनुभवांमुळे विकसित झालेली माणसाची तर्कनिष्ठ बुद्धी ‘ईश्वर’ ही संकल्पना ठामपणे नाकारू पाहते आणि हजारो वर्षांच्या संस्कारांमुळे, निसर्गातील दिव्यत्वाच्या साक्षात्कारामुळे आणि कदाचित आनुवंशिकतेमुळेही खूप खोलवर श्रद्धेचे बीज रुजलेले माणसाचे मन ईश्वराला स्वीकारू पाहते. माणसाची ही बुद्धी आणि मन, विचार आणि भावना यांच्यातील ही रस्सीखेच कुसुमाग्रजांना अचंबित करीत राहते. आणि दिवाणखान्यात चार-चौघांच्या संगतीत ईश्वराला नाकारणाऱ्या स्वत:लाच ते ईश्वराच्या तोंडून ‘तो’ या कवितेत सांगतात-
‘पण तरीही मला माहीत आहे
मला मानणाऱ्यांमध्ये तू अग्रेसर आहेस
फक्त तुझा दिवाणखाना 
तुझ्या काळजापासून फार दूर आहे, इतकेच.’ 
‘रिटायर परमेश्वर’ या कवितेत, ईश्वर आहे की नाही, या शंकेचीच कुसुमाग्रज एका विलक्षण तर्काने थट्टा उडवितात. परमेश्वर हा रेव्हेन्यू कचेरीतल्या कारकुनाकडे जन्मतारखेचा दाखला मागतो आहे, अशी कल्पना ते मांडतात. कारकून त्यांना निदान एखाद्या गॅझेटेड ऑफिसर किंवा गावातल्या एखाद्या मोठय़ा माणसाचे सर्टिफिकेट आणायला सांगतो. 
त्यावर परमेश्वर म्हणतो- ‘असं कोण आहे?’
कारकून : ‘तुम्ही त्या डॉक्टरांकडे जा, ते देतील.’
परमेश्वर : ‘पण मला काही झालेलं नाही.’
कारकून : ‘अहो, ते डॉक्टर प्रसिद्ध नट आहेत.’
परमेश्वर : ‘ओह! त्यांनी तर मला रिटायर होण्याचा आदेश दिलाय.’
कारकून : ‘मग तेच सर्टिफिकेट देतील. कारण त्यांचीच मागणी आहे ती.’
परंतु बुद्धीने, तर्काने स्वत:ला समजावण्याचा प्रयत्न केला तरीही एकंदरीत कुसुमाग्रजांना ईश्वर हा ‘परस्थ’च वाटत राहतो. ते देवाला म्हणतात-
‘तू हा विषय पाहण्याचा नाही, शोधण्याचाही नाही.
तो विषय आहे फक्त अनुभवण्याचा.
माझे पाहणे अनुभवापर्यंत पोचत नाही तोपर्यंत तू मला परस्थच. 
असून नसल्यासारखा. किंबहुना नसल्यामुळेच, नसल्यासारखा.’
पण कुसुमाग्रजांमधला कवी जेव्हा रात्रीच्या एकांतात चांदण्यांनी नटलेले आकाश पाहतो तेव्हा त्यांच्या मनाला त्या अपूर्व सौंदर्यनिर्मितीमागची गूढ शक्ती जाणवते. एक नवीन ‘नजर’ येते आणि ते म्हणतात-
‘की या निरीश्वरवाद्यांनी, उत्तररात्री उठून
पाहिलेले नाही कधीही, चांदण्यांनी खचलेले
अपार धूसराने ओथंबलेले आकाश, माझ्या नजरेने.’
मनाच्या अंतर्चक्षूंना या दिव्यत्वाचे क्षणभर दर्शन होते- न होते तोच बुद्धी आपले डोळे मिचकावून सांगते- 
‘सर्वत्र तुझे आहेपण
कल्पनेनेच, प्रस्थापित केलेले.’
मग कुसुमाग्रजांची बुद्धी ‘प्रश्न’ उभा करते- 
‘पण हे सर्व कळल्यावर, अखेरी अंतिम प्रश्न येतो-
कल्पिते कोठून येतात?’
आणि लगेच तीच बुद्धी या प्रश्नाचे उत्तरही देऊन टाकते-
‘हे प्रश्नचिन्ह पुन्हा, तुझ्याकडेच घेऊन जाणारे.’
जीवनाच्या प्रवासात कुसुमाग्रजांची नास्तिकता हळूहळू कमी होत गेली. ‘मूळ प्रश्न माझा, योजनेवाचून, गोंधळ हे भव्य, केलेस तू कसे?’ हा प्रश्न जरी अनुत्तरीत राहिला, तरी ज्या संताने परमेश्वर ही संकल्पना शोधली आणि परमेश्वराच्या स्वरूपात जन्मदात्रीचे नि:स्वार्थ हात व वत्सल स्तन पाहिले, त्या संताला ‘मानवजातीचा सर्वश्रेष्ठ कल्याणकर्ता संशोधक’ असे संबोधण्याइतकी कुसुमाग्रजांची आस्तिकता प्रगल्भ झाली. याच प्रगल्भ जाणिवेतून आणि कदाचित गुरूदेव टागोरांच्या ‘गीतांजली’च्या प्रभावातूनही असेल, कुसुमाग्रज देवाला म्हणाले-
‘आता आता, या मृत्यूयात्रेत मात्र, 
जेव्हा माझ्या शून्यारलेल्या मनाला 
तुझ्या अस्तित्वाची यादही नसते 
तेव्हा, सर्वाकडून दुर्लक्षित असा तू, 
माझ्या खांद्यावर हात ठेवून
माझ्याबरोबर अनामंत्रित चालत आहेस.’
परमेश्वर नाही असे घोकत बसणाऱ्या कुसुमाग्रजांनी रात्रीच्या नीरव शांततेत आकाशातल्या चांदण्यांना त्याच्या अस्तित्वाविषयी विचारले तेव्हा त्यांना उत्तर मिळाले-
‘स्मित करून म्हणाल्या, मला चांदण्या काही,
तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही
उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे, 
त्यांनाच पुससी तू, आहे की तो नाही!’
तात्यासाहेबांच्या तोंडात सतत सिगारेट आणि मुखात ‘श्रीराम’ हा शब्द असे. पण ही रामभक्ती होती असे बिलकूल नाही. तात्यासाहेबांच्या उतारवयात त्यांच्या धाकटय़ा बंधूंनी ‘के. रं.’नी त्यांना गमतीने विचारले, ‘तात्या, आजकाल तुझे परमेश्वराशी संबंध कसे आहेत?’ तात्या प्रसन्न हसले आणि म्हणाले, ‘सध्या खूपच छान आहेत.’ आणि खरोखरच तात्यासाहेबांचे ईश्वराशी संबंध इतके सुधारले, की त्यांनी ‘श्रीरामा’चे भजन लिहिले-
‘हे राम श्रीराम, श्रीराम राम, संसारी तारील, तुझेच नाम।।
दयेच्या सागरा, आर्ताच्या आधारा, 
आम्हाला आसरा, तुझेच नाम।।’
ऐन तारुण्यात जरी कुसुमाग्रजांनी परमेश्वराचे अस्तित्व मानले नाही, तरी जसजसे विश्वातील गूढ प्रश्न मनाला जाणवू लागले, जसजसे ऐहिक पाश तुटत गेले, जसजसा एकाकीपणा वाढू लागला, तसतशी कुसुमाग्रजांच्या मनात आस्तिकता पसरू लागली. माणसाच्या जीवनातील आणि निसर्गातीलही ईश्वराच्या सौंदर्यमय आणि प्रेममय अस्तित्वाचा सुगंध त्यांच्या अंत:करणात परमळू लागला.
कुसुमाग्रजांना अंतिमत: मनोमन प्रतीत झाले की, ‘माणसाची आस्तिकता ही अखेरत: त्याच्या सौंदर्यशोधनाचा एक आविष्कार आहे. न मानण्यापेक्षा मानण्याचे सौंदर्य निखालस अधिक आहे.’

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...