सौजन्य: दै. लोकसत्ता
‘मेरे देश की धरती’, ‘यारी है इमान मेरा’ इत्यादी लोकप्रिय गाण्यांचे गीतकार गुलशन बावरा यांचे आज मुंबईतील पाली हिल भागातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आहे. गुलशन बावरा यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाचे देहदान करण्यात येणार आहे. गुलशन बावरा यांना रंगीबेरंगी शर्ट घालण्याची हौस होती. त्यामुळे चित्रपट वितरक शांतीभाई पटेल यांनी त्यांचे ‘बावरा’ असे नामकरण केले होते. पाकिस्तानात जन्मलेले गुलशन बावरा फाळणीनंतर त्यांच्या मात्यापित्यासह भारतात आले. पण त्यावेळी झालेल्या दंगलीत त्यांचे आईवडिल मारले गेले. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी काही काळ भारतीय रेल्वेखात्यातही काम केले होते. ते फार चोखंदळ असल्यामुळे त्यांच्या ४९ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी केवळ २५० गाणी रचली. १९५९ साली प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रसेना’ या चित्रपटातील ‘मै क्या जानू कहाँ’ या गाण्यापासून त्यांची कारकीर्द सुरू झाली. ‘सट्टा बाजार’ या चित्रपटातील ‘चांदी के चंद टुकडो के लिये’, ‘आकडे का धंदा’ आणि ‘तुम्हे याद होगा कभी हम मिले थे’ या गाण्यांमुळे बावरा यांचे नाव चर्चेत आले. कल्याणजी-आनंदजी या दुकलीने त्यांच्या ६९ गाण्यांना संगीत दिले होते.
No comments:
Post a Comment