खासगी टीव्ही वाहिन्यांच्या मालकांच्या कृपेने भरपेट मराठी मालिका रात्रंदिवस बघायला मिळतात. भरपूर नफा दिसल्यामुळे मालिकांचे पीक अमाप निघते पण त्यांचे ग्राहक बहुसंख्येने आमच्या माता-भगिनीच असतात. नोकरी करणाऱ्या महिला सायंकाळी या मालिका आवर्जून बघतात आणि गृहिणीवर्ग निवांतपणे दुपारी त्यांचा आस्वाद घेत असतो. पण अशाने वाहिन्यांचा टी.आर.पी. वाढण्याशिवाय बाकी काही साध्य होत नाही कारण या कार्यक्रमांचा बौद्धिक-मानसिक- शारीरिक विकासासाठी काही उपयोग नसतो.
याचा परिणाम म्हणजे जेव्हा ‘भावजी’ त्यांना विचारतात की, ‘आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन कोणता?’ तेव्हा त्यांना उत्तर देता येत नाही. अथवा ‘चालता बोलता’ विचारतो की, ‘संत रामदासांचे नाव काय?’ तेव्हा त्यांची बोलती बंद होते. त्या आपल्या फक्त नथ घालून ‘पाहायला आलेल्या’ कार्यक्रमासारख्या बसलेल्या असतात!
कित्येक गृहिणी साधे वर्तमानपत्र वाचत नाहीत, असे पाहण्यात आलेय. बऱ्याच गृहिणींकडे जी नियतकालिके येतात त्यात रोजच्या घडामोडींपेक्षा चघळता येणाऱ्या बातम्याच जास्त असतात.
म्हणून म्हणतो, गृहिणींनी खूप शिकावे. वाचावे. तरच त्यांना जगात काय चाललेय ते समजेल.
उल्हास सहस्रबुद्धे, कांजूर मार्ग, मुंबई
लोकमानस,लोकसत्ता
No comments:
Post a Comment