Showing posts with label cyber crime. Show all posts
Showing posts with label cyber crime. Show all posts

‘आ’बाळ दिन!

सौजन्य :लोकसत्ता,पंकज भोसले

altपिढीगणिक तीन पावले पुढे असलेली पिढी जन्माला येत असते. प्रतिगामी आणि पुरोगामी यांचे निकष या काळात अंतर्बाह्य बदलत असल्याने हा स्वाभाविक फरक येतो. पण एकेकाळची ‘फॉरवर्ड’ पिढी नव्या पिढीच्या नव्या ‘व्हर्जन्स’ला नावे ठेवण्यात आणि ‘आमच्या काळात असे नव्हते’च्या गुळगुळीत पाढय़ाला गुणगुणण्यात चुकत नाही. उपग्रह वाहिन्यांच्या आक्रमणानंतर एम.टीव्ही आणि नव्याने आलेल्या ‘चॅनल’ मायाजालात रांगत वाढलेली पिढी आणि इंटरनेट सुलभीकरणानंतर ऑरकूट-फेसबुकाला लगडत तयार झालेली अतिनवी पिढी या दोहोंमधील अंतर आज मोठे आहे. भविष्यातील नेतृत्त्व म्हणून आजच्या तरुणाईकडे पाहण्याच्या ढोबळ संकल्पनेत या दोन्ही पिढीला एकत्रित म्हणून पाहिले जाऊ शकेल.  मात्र एकाच काळातल्या पण विभिन्न प्रवाहांचे बरे-वाईट संस्कार पचवण्याच्या धडपडीत अडखडळणारी ही पिढी भयाण अशा तंत्र-सांस्कृतिक कोलाहलामध्ये अडकण्याची भीती आहे. ‘बालदिना’च्या निमित्ताने ‘दिन’ व ‘दीन’ यांच्या सरधोपट शब्दकसरतीऐवजी या पिढीच्या मानसिकतेवर वेगळ्या अंगाने क्ष-किरण टाकण्याचा प्रयत्न केलाय पंकज भोसले यांनी..

देशातील १९९० सालातील १० ते १५ वयोगटातील मुले आणि  २०१० मधील त्याच वयोगटाची मुले यांच्या बुद्धय़ांकामध्ये तफावत आढळेल. अर्थातच २०१०मधील मुले अधिक ‘स्मार्ट’, चाणाक्ष, अभ्यासू, जिद्दी, हट्टी दिसतील. १९९० सालातील या वयोगटाची मुले या सर्वात मागे असतील, पण त्यांचा आनंद निर्देशांक (हॅपीनेस इंडेक्स) हा २०१०तील मुलांहून अधिक असेल. बाह्यसंस्कार करणाऱ्या गोष्टींची पारंपरिक (कुटुंब, शाळा, भवताल, परिसर, समवयस्क स्नेही आदी) यादी सोडली  तर या दोन पिढय़ांच्या वयोगटावर प्रभाव पाडणाऱ्या मुख्य घटकांकडे पाहिले तर त्यावरून हा निष्कर्ष पटण्याची शक्यता अधिक होईल.
१९९० सालचे दूरदर्शन हे बालप्रेक्षकांना या ‘बॉक्स’पुढे ‘इडियट’ करण्याइतपत प्रभावी नव्हते. कृषिदर्शन, संतवाणीसारख्या कार्यक्रमांनी आणि रसाळशत्रू चर्चा परिसंवादांनी या पिढीची टीव्ही आकर्षणे शनिवार-रविवारीय सिनेमे, चित्रगीते यांच्यापर्यंत मर्यादित होती. रेडिओवर आकाशवाणी केंद्रांची जादू टिकून होती. अमीन सयानी रेडिओतील अमिताभ बच्चन होते आणि रेडिओ कार्यक्रमांद्वारे आगामी सिनेमांचे प्रोमोज ऐकून त्यावर चर्चा होई. दूरदर्शन-रेडिओव्यतिरिक्तचे जगही जबरदस्त बैठय़ा-मैदानी खेळांनी सुसज्ज होते. गोटय़ा, भोवरे, पतंग, बिल्ले मोसमागणीक येणाऱ्या सणासारखे होते. गल्ली क्रिकेट, बॉक्स क्रिकेट, मैदानी क्रिकेटस्पर्धाही (दोघात दोन ते पाच व चेंडू या बोलीवर आज दोन संघात मॅच होतात की नाही, कळणे नाही.) शालेय सुटय़ांना शरीरमनाने समृद्ध करणाऱ्या होत्या. दर्जेदार साहित्यिक नियतकालिकांनी, किशोर, आनंद, ठकठक, चंपकसारख्या मासिकांनी ग्रंथालये तत्कालिन वाचनकिडय़ा बालकांची मौज होत होती. तेव्हाही बिघडणाऱ्या शालेय मुलांची संख्या कमी अधिक प्रमाणात आजसारखीच असेल, पण बिघडण्याचे निकष आजच्या पातळीत फारच साधे वाटू शकतील.
१९९२ सालानंतर दूरदर्शनची जागा उपग्रह वाहिनीने घेतली आणि मुलांवर चांगले बाह्यसंस्कार करणाऱ्या अनेक जागा एकेक करून कमी होऊ लागल्या. पहिला फटका पडला तो मैदानी खेळांपैकी पतंगींना. आज केवळ शहरांतल्या प्रमुख झोपडपट्टी, निम्नमध्यमवर्गीय वस्त्यांमध्ये आणि मकर संक्रांतीच्या आगे-मागे पतंगी दिसतात. मात्र पूर्वी या खेळाला जे वैभव होते, ते लोप पावले आहे. तीच गत गोटय़ा, भोवरे यांच्याबाबतही झाली. क्रिकेटभोवतीचे वलय आज अधिक असल्याने हा खेळ शाबूत आहे, दुसरा सचिन तेंडुलकर मात्र तयार झाला नाही. उपग्रह वाहिन्यांचे केबलसर्प इमारतींना, मोकळ्या आकाशाला गिळंकृत करू लागले. मग चॅनल्सची मोठी खाण विशिष्ट विषयानुरूप समोर आली. डिस्कव्हरीवर ‘आज आपने क्या खोजा?’ करणारी व एटीएन, एमटीव्हीवरील सिनेमांचे प्रोमोज पाहण्यात रमणारी पिढी तयार झाली. रेडिओ प्रोग्रामची जागा या प्रोमोजनी घेतली. गाण्यासह आगामी सिनेमातील नेत्रखेचक घटना एटीएन नामक वाहिनीवर दिवसच्या दिवस पुन्हा पुन्हा पाहणारी पिढी खूप मोठय़ा प्रमाणावर होती. चार ते सहा वर्षांत केबलचे सार्वत्रिकीकरण झाले. १९९८ पर्यंत गावागावांतील बाळगोपाळांवर उपग्रह वाहिनीने कब्जा केला आणि ‘दूरदर्शन शाप की वरदान?’ या निबंधाला शालान्त परीक्षेत अंमळ अधिकच महत्त्व आले.
उपग्रह वाहिन्यांनी मैदानी खेळ हरवून बसलेली, टीव्हीच्या डेली सॉपच्या भयाण कौटुंबिक कहाण्यांवर पोसलेली पिढी नक्कीच संकरित स्मार्टपण घेऊन आलेली होती. त्यांच्या लैंगिक जाणीवा आधीच्या पिढीच्या दुप्पट होत्या. कारण येणारे चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका इतकेच नव्हे तर जाहिरातींनीही त्यांची समज विस्तारण्यात मदत केली होती. ही पिढी अवांतर वाचन हरवून बसली होती, कारण अभ्यासानिमित्ताने स्पर्धा वाढल्याने अभ्यास पूर्ण करण्याची मारामार, शाळा, क्लासने खालेल्या वेळा, समज वाढल्याने भिन्नलिंगी आकर्षणांचे गुलामपण यातून अतिरिक्त वाचनाऐवजी टीव्ही, चित्रपट, वॉकमन, एफएम रेडिओ यांच्याकडे या पिढीचा कल वाढू लागला होता. स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी पारंपरिक आवडत्या शिक्षण शाखांमध्ये प्रवेश मिळविण्याऐवजी इंजिनीअरिंगच्या वाटेवर जाण्याची जोखीम पत्करण्याचे फॅड आले. या मानसिकतेतूनच ‘एटीकेटी’ संस्कृतीचा पसारा वाढत गेला, पण त्याहून भयंकर अशी गोष्ट घडली, ती ‘इंटरनेट सॅव्ही’ असलेल्या अतिनव्या पिढीच्या आगमनाने.
१९९९ ते २००३ हा सायबर कॅफेच्या भरभराटीचा काळ होता. जगाशी एकरूप होण्यासाठी, ज्ञानार्जनासाठी त्याचा वापर करणारे अल्पसंख्य होते, पण तासन्तास इंटरनेटवर जगातील भिन्न लिंगी व्यक्तींशी  ‘फेक चॅटिंग’ची हौस भागवणारी, ‘वाईट साइट्स’च्या पंढरीचे वारकरी बनत अकळत्या वयात फुलणारी पिढी इंटरनेटमुळे तयार झाली . इंटरनेटसोबत तंत्रज्ञानात झालेला अमूलाग्र बदल, जग जवळ आल्यामुळे फॅशनग्रस्ततेचा जागतिक प्रसार यामुळे मोबाइलवर चॅटिंग, टेक्स्टिंग (नंतर सेक्स्टिंग) करणारी, सोशल नेटवर्किंग साइट्ससारख्या आभासी जगात हजार मित्र बनवणारी पण प्रत्यक्षात एकांतग्रस्त बनलेली पिढी वाढू लागली.  ‘इंटरनेट शाप की वरदान?’ हा नवा विषय शालान्त परीक्षेत लोकप्रिय बनला.
कॅसेट प्लेयरची जागा एमपीथ्री सीडीने आणि नंतर आयपॉडने घेण्याचा बदल जसा नकळत चमत्कार झाल्यासारखा वेगाने घडला, तेवढय़ाच वेगाने या पिढीच्या मानसिकतेमध्ये फरक पडला. कुटुंबसंस्थांसोबत इतर सर्वच सामाजिक संस्थांना हायटेक युगाने व्यापल्यामुळे मानवी नातेसंबंधांमध्ये खोलवर बदल झाले. इंटरनेट आज घराघरांत सहजपणे उपलब्ध आहे. मोबाइल अ‍ॅप्लिकेशन, संगणकातील नवनवीन सॉफ्टवेअर्स, व्हिडीओ गेम्सच्या राशी यांमधून कामाची व रंजनाची अधिकाधिक साधने या पिढीसमोर आली. पण त्याच साधनांमुळे स्थूलत्वापासून इंटरनेट(internet), पोर्न, सोशल नेटवर्किंग(social networking) आदींच्या व्यसनाने या पिढीला अंतर्बाह्य पछाडले आहे. अस्वस्थता, चिडचिडेपणा, नकारात्मकता यांचा मारा पिढीची निकोप शरीरामनापासून आबाळ करीत आहे. मित्रांत आणि कुटुंबातही एकांतवास अनुभवण्याची इच्छा बाळगणारे, निद्रानाशाला कवटाळणारे व अस्तित्त्व हरवून बसणाऱ्या कोलाहलात रमणारे जीव या पिढीमध्ये निर्माण होत आहेत. प्रत्येक समाजात असेच सिनेमे बनतात, जे पचविण्याची समाजाची लायकी असते. आज आभासी जग समाजाशी इतके रुळले आहे की सुपर डय़ुपर हीट सिनेमा बनविण्यासाठीही रा.वनसारख्या चित्रपटात आभासी जगाच्या विषयाशी साटेलोटे झालेले दिसते.
१० ते १५ वयोगटातील मुलांच्या मनावर तंत्रज्ञानातील दररोज होणाऱ्या बदलाचे आघात इतके मोठे आहेत, की वरवर सामान्य दिसणाऱ्या व सामान्यपणे वावरणाऱ्या मुलाला इंटरनेट, व्हिडीओ गेम, मोबाइल टेक्स्टिंग, चॅटिंग यापैकी कोणत्या ना कोणत्या सवयींनी ग्रासले आहे. क्षुल्लक बाबींवरून आत्महत्येचा विचार डोकावणे, नशेच्या स्वाधीन होणे, एकाग्रता व मनस्वास्थ हरवून बसणे या समस्येच्या पुढल्या पायऱ्या आहेत. विविध इलेक्ट्रॉनिक गॅझेटची सवय इतकी खोलवर गेली आहे, की त्यांच्यात बदल होण्याची शक्यता नाही.   उलट पुढच्या काळात ती आणखी उग्ररूप धारण करणार आहे. अमेरिका, युरोप, चीन, तैवान, दक्षिण कोरिया या राष्ट्रांमध्ये इंटरनेट व मोबाइलच्या व्यसनातून लहान मुलांना सोडवण्यासाठी सुधारगृह उभारण्यात आली आहेत, पण त्याला तितकेसे यश आलेले नाही.  स्पर्धेत टिकण्यासाठी भल्या - बुऱ्या सर्व मार्गांचा अवलंब करणारी, अपयश, यश या दोहोंना पचविण्याची क्षमता हरवून बसणारी व बाह्यसंस्कारांच्या मूलभूत घटकांमधूनही पुरेसे मार्गदर्शन न मिळाल्याने हरवून गेलेली अशी ही पिढी चंचल बनली आहे. मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, शिक्षक, पालक यांच्यासाठी येणारा काळ सर्वात आव्हानाचा ठरणार आहे. या पिढीच्या समस्याच समजून घेतल्या नाही, तर तिच्या पुढच्या ‘व्हर्जन्स’ही समस्यांबाबत तीन पावले पुढे असतील. तेव्हा पुढच्या पिढीची निकोप शरीरमनापासून होणारी आबाळ टाळण्यासाठी आत्ताच मुलांना त्यांच्या कलेने समजून घेणे, विश्वासात घेणे आवश्यक आहे. दररोज कुठल्या ना कुठल्या आंतरिक समस्येने पोखरत जाणाऱ्या व आबाळ दिनाचा उत्सव साजरा करणाऱ्या या पिढीसाठी तो खरा निकोप बालदिन असेल.

इंटरनेट प्रताप!
गेल्यावर्षी भारतातील प्रमुख दहा शहरांमध्ये ८ ते १८ वयोगटातील दीड हजार मुलांची पाहणी करण्यात आली. त्यात ८ ते ११ वर्षांची ५२ टक्के मुले पाच तासांहून अधिक काळ इंटरनेट वापरतात, तर १२ ते १५ वयोगटातील ५८ टक्के तर १६ ते १८ वयोगटातील ५६ altटक्के मुले इंटरनेट व्यसनांध झाल्याचे समोर आले. अभ्यासाव्यतिरिक्तचा वेळ ही मुले नेटवर चॅटिंग(chatting), इ-मेल(e-mail), सोशल नेटवर्किंगवर वापरत असल्याचे यात पुढे आले. सृजनशीलतेला वाव मिळणारे वाचन अथवा शरीराला व्यायाम देणारे मैदानी खेळ यांच्यापासून ही मूले कित्येक कोस दूर असल्याचे पाहणीत लक्षात आले. ही मुले अधिकाधिक भ्रामक विश्वात रमणारी असून जगापासून तुटत एकलकोंडी होण्याची क्षमता बाळगणारी असल्याची भीती पाहणीत व्यक्त करण्यात आली होती. घरातील व्यक्तींशी नातेसंबंध त्रोटक होत जाऊन त्यांची आभासी जगातील नात्यांची ओढ अधिक असल्याचे सत्य अहवालाने मांडले होते. सायबर गुन्ह्यांच्या समस्या आहेतच मात्र त्याहून अधिक समस्या  इंटरनेटने उभ्या केलेल्या विश्वाच्या आहेत. ‘ब्लँक’ होणे किंवा स्मरणशक्तीला चालना न मिळणे या समस्येच्या अगदी सुरुवातीच्या पायऱ्या आहेत. इंटरनेटचा अनावश्यक गोष्टींसाठी वापर करणे टाळल्यास या समस्या उग्र होऊ शकत नाहीत.

टीव्हीचा भुलभुलैया!
हार्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासकांनी यावर्षी अभ्यासाद्वारे सिद्ध केले की दररोज दोन तासांहून अधिक टीव्ही पाहिल्याने मधुमेह आणि हृद्यविकार निर्माण होऊ शकतो. टीव्ही केवळ शारीरिक हालचालीच कमी करीत नाही, तर त्यातील खाद्यपदार्थाच्या जाहिराती मुलांच्या altखाण्याच्या सवयी बिघडवू शकतात असा इशारा अ‍ॅकेडमी ऑफ पेडिअ‍ॅट्रिक्स काऊन्सिलने आपल्या अहवालातून दिला आहे. भारतात फास्ट फूड, जंकफूडच्या कंपन्या विस्तारल्या आणि दोन मिनिटांत शिजणाऱ्या सूप्स, नूडल्स, सॉस यांचे ठराविक ब्रॅण्ड्स वाणसामानाच्या यादीत अत्यावश्यक गटात मोडली गेली. अमेरिकेत लहान मुलांचे स्थूलत्त्व हा ज्वलंत प्रश्न बनला आहे. इंटरनेटसोबत टीव्हीवर तासन तास खर्च करणाऱ्या पिढीला निद्रानाश, दुस्वप्नांनी पछाडल्याचे अहवालात म्हटले आहे. उपग्रह वाहिन्यांनी भारतीय बाजारपेठांमध्ये शिरकाव केल्यानंतर लहान मुलांमध्ये िहसा, गुन्हेगारी प्रवृत्ती प्रबळ झाल्याचे अहवाल आहेत. फास्ट फूड कंपन्यांची उत्पादने घरोघरी पोहोचविण्यात टीव्हीच कारणीभूत ठरला असून, बालप्रेक्षकांमुळे कार्टून वाहिन्याही बलाढय़ झाल्या आहेत.

मोबाइल वेड!
१९९९ पर्यंत कुतूहलाची गोष्ट म्हणून पाहिला जाणारा मोबाईल २००९ मध्ये लहान मुलांच्या खेळण्यासमान परिचित आणि सार्वत्रिक झाला. घरात संभाषणशत्रू असलेली पिढी मोबाइलवेडाने झपाटली गेली, ती याच काळात. मोबाइलमधून निघणाऱ्या प्रारणांनी मेंदूवर altपरिणाम होतो, का होत नाही याबाबत उलट-सुलट शेकडो अहवाल आत्तापर्यंत दाखल झाले, पण मोबाइलवेड कमी झाले नाही. जटिल अ‍ॅप्लिकेशन सुलभपणे हाताळणाऱ्या या पिढीच्या शरीराचा मोबाइल हा एक घटक बनला आहे. निद्रानाश, तणाव, थकवा, चिडचिडेपणा, अशांत मानसिकता यांचे धनी बनविणाऱ्या मोबाइलला विकतचे व्यसन म्हणणे योग्य ठरेल. अनेक अहवालांनी मोबाइल वेडाला ड्रग्जच्या व्यसनाइतके कडवे असल्याचे म्हटले आहे. मोबाइलवर चॅटिंग, टेक्स्टिंग आणि गेम्स खेळण्यात मश्गुल होणाऱ्या पिढीची मानसिक दुर्बलता बदलता येणार नाही. इतका मोबाइल आज त्यांच्या आयुष्यावर व्यापला आहे.

सृजन दुर्बलता!
मोबाइल, इंटरनेट आणि टीव्हीमध्ये आयुष्याचा सगळा बहुमोल व्यतीत करणाऱ्या या पिढीला कल्पना शक्तीचे वावडे आहे. वाचनअभावामुळे किंवा पाठय़पुस्तकांपलीकडचे जग अपरिचित असल्यामुळे मुलांची सृजनक्षमता हळूहळू कमी होत चालली altअसल्याची चिंता जगभरातील समाजशास्त्रज्ञ आणि मानसतज्ज्ञांमध्ये निर्माण झाली आहे.  हवी असलेली सर्व माहिती इंटरनेटच्या एका क्लिकवर मिळत असल्याच्या भ्रमात गुगलॅक्चुअल बनलेली ही पिढी स्वतच्या कल्पना शक्तीला श्रम देण्याचे टाळतात. दूरध्वनी क्रमांक मोबाइलमध्ये सेव्ह असल्याने कुणाचा नंबर लक्षात ठेवण्यासाठी स्मरणशक्तीला थोडाही व्यायाम करावा लागत नाही. त्या व्यायामाअभावी स्मरणशक्ती क्षीण होत चालली आहे. मोकळ्या हवेत पतंग उडविण्यातून मिळणारा बहुमोल आनंदही या पिढीला घेता येऊ शकत नाही. मैदानी खेळ मर्यादित आहेत. याचा परिणाम पुढील काळात स्थूलत्त्व आणि अभिरूचीहीन समाजाच्या निर्मितीत पाहायला मिळणार आहे.
pankaj.bhosale@gmail.com

Hey, व्हॉट्‌सअप dude?

सौजन्य :सम्राट फडणीस (samrat।phadnis@esakal.com)
इंटरनेटनं विस्तीर्ण, अविश्‍वसनीय असं खासगीपण दिलंय. 'मी जे काही करतोय, ते फक्त मला आणि मलाच माहीत आहे, दुसरं कुणाला नाही,' हा विश्‍वास निर्माण केलाय. या विश्‍वासानं सोशल नेटवर्किंग वेबसाईट्‌सवर उतरणारी उमलती तरुणाई 'प्रोफाइल इमेज'मध्ये अडकतेय...? त्यातून समस्या तयार होताहेत...? या समस्यांवर मार्ग आहे...?

'सिझलिंग् सलमान' या 'प्रोफाइल'वरून त्याच्याशी ओळख झाली. तो सलमान खानचा जबरदस्त फॅन. 'मस्क्‍युलर बॉडी' दाखवणाऱ्या सलमानच्या फोटोंनी त्याचा ऑर्कुट अल्बम भरलेला. मुलींशी 'चॅट' करण्यासाठी आणि त्यांना 'फ्रेंड रिक्वेस्ट' पाठविण्यासाठी हा 'सलमान' तासन्‌तास नेट कॅफेत पडून. जेवढा वेळ 'ऑनलाइन' असतो, तेवढा आख्खा वेळ त्याचं विश्‍व पूर्ण वेगळं. त्याची ओळख पूर्ण वेगळी. 'की बोर्ड'वर झरझर फिरणारी बोटं आणि चेहऱ्यावरचे बदलते हावभाव पाहिले, तरी सहज लक्षात यावं, की हा 'ऑनलाइन सलमान' कुठल्या तरी अनोख्या दुनियेत प्रवास करतोय...

...आणि ही 'कुल कॅट'. 'बोल्ड अँड ब्युटिफूल' असा तिचा 'प्रोफाइल लुक'. माहिती असो वा नसो, जगातल्या कोणत्याही विषयावर अत्यंत आत्मविश्‍वासानं 'चॅट' करणारी. गंमत म्हणून सहज तिच्या खऱ्या माहितीविषयी छेडलं, तर 'You betrayed' असं म्हणून 'ऑनलाइन' रुसणारी आणि मग रागावून 'ऑफ लाइन' होणारी. पुढच्या वेळी ऑनलाइन दिसलीच, तर तिच्याकडून रुसल्याच्या खुणा दाखवणारे 'स्मायलीज्‌' ठरलेलेच...! खरी माहिती विचारायची नाही, या अटीवरच पुढचा संवाद सुरू होणार...

सोशल नेटवर्किंग वेबसाईट्‌सच्या ऑनलाइन कट्ट्यांवर रोज असे 'सिझलिंग् सलमान' आणि 'कुल कॅट' शेकडोंनी भेटताहेत. वास्तवातल्या आयुष्यापासून फारकत घेणाऱ्या ऑनलाइन 'प्रोफाइल इमेज'वर जगणारे. कुणीतरी सांगितलं म्हणून किंवा कुठंतरी पाहिलं म्हणून किंवा 'फन' म्हणून बनवलेले स्वतःचे खोटे 'प्रोफाइल'. हळूहळू या खोट्या 'प्रोफाइल'ची झिंग मनावर चढू लागते. स्वतःची खरी ओळख किमान काही तास तरी विसरायला लावण्याची जबरदस्त 'ताकद' या 'सोशल नेटवर्किंग'मध्ये मिळू लागते. पाहता पाहता ही झिंग वास्तवातलं आयुष्य आणि ऑनलाइन आयुष्य यात एक अदृश्‍य दरी तयार करते. खरेतर एका 'क्‍लिक'वर ही आभासी दरी कधीही ओलांडता येते; मात्र बहुतेक वेळा दरीच्या 'ऑनलाइन प्रोफाइल'च्या टोकाला जाण्याची इच्छाच प्रबळ राहते आणि 'ऑनलाइन प्रोफाइल'मध्येच मुलं-मुली रमू लागतात. खरी ओळख लपविण्यासाठी वापरलेले 'प्रोफाइल' हीच आपली खरी 'ऑनलाइन' ओळख मानू लागतात. किमान काही तासांसाठी तरी 'आयडेंटिटी क्रायसिस'ची शिकार बनतात...

विस्तारते मैत्र आणि तिरसट पालक...
गेल्या दशकभरात भारतात माध्यम म्हणून इंटरनेट प्रचंड गतीने वाढते आहे. २००० साली देशात पन्नास लाख लोक इंटरनेट वापरत असत. २०१० साली हीच संख्या साडेचार कोटींवर आहे. पाच वर्षांपूर्वी केवळ शहरी भागापुरते मर्यादित असणारे हे माध्यम आता ग्रामीण भागातही तितकेच सक्षमपणे रुजू लागले आहे. शहरी आणि ग्रामीण उमलती तरुणाई या माध्यमाच्या प्रेमात आहे. माहितीचा महासागर असलेल्या इंटरनेट माध्यमाने सोशल नेटवर्किंग वेबसाईट्‌सच्या रूपाने बसल्या जागी जगाशी मैत्र जोडण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ओळखीच्या मित्र-मैत्रिणींचा 'ऑनलाइन कट्टा' भन्नाट चालतो. फेसबुक, माय स्पेस, ऑर्कुटवर असे कट्टे अक्षरशः लाखोंनी आहेत. अशा 'ऑनलाइन कट्ट्यां'नी मैत्र वाढतेय, घट्ट होतेय. त्याच वेळी विस्तारणाऱ्या क्षितिजामधून धोकेही तयार होताहेत. या संभाव्य धोक्‍यांची पुरेशी जाणीव ना इंटरनेट वापरणाऱ्यांना (मुले-मुली) आहे, ना इंटरनेटकडे तिरसटासारखे आणि तिऱ्हाईताप्रमाणे पाहणाऱ्यांना (पालकांना).

प्रायव्हसी सेटिंग्ज वापरा
सोशल नेटवर्किंग वेबसाईट्‌सवर सर्वाधिक संख्येने तरुणाई आहे. उमलती आणि तारुण्यात प्रवेश करती झालेली. सुरक्षितता म्हणून पत्ता, फोन नंबर न देणे मान्य झालेले आहे. व्यक्तिगत माहितीचा वापर करून त्रास दिला गेल्याची, फसवणूक झाल्याची उदाहरणे जगभर आहेत. त्यामुळे ही माहिती नाही दिली, तर अगदीच गैर केले, असे नाही. प्रवासात किंवा रस्त्यावर सहज ओळख झालेल्या व्यक्तीला आपण आपली किती माहिती देतो? तितकीच माहिती ऑनलाइन प्रोफाईलवर असावी. ही माहिती विश्‍वासार्ह व्यक्तींनाच द्यावी, हा संकेत. त्यासाठी 'प्रायव्हसी सेटिंग्ज'ची नीट माहिती आपल्याला हवी. त्यामुळं दिलेली माहिती शंभर टक्के सत्य असेल, तरीही ती कुणाला दाखवायची आणि कुणाला नाही, याचा अधिकार सर्वस्वी 'यूजर्स'च्या हाती राहतो.

'प्रोफाइल इमेज'च्या समस्या
तथापि, प्रश्‍न सुरू होतात, ते वास्तवातल्या 'मी'पेक्षा अगदी वेगळी अशी 'ऑनलाइन इमेज' तयार करण्यातून, त्या 'प्रोफाइल इमेज'मध्ये अडकण्यातून. अशा वर्तनातून निश्‍चितपणे काही समस्या तयार होत आहेत. सहज दृश्‍य समस्या म्हणजे या प्रकारच्या 'प्रोफाइल्स'ना वास्तवात यायची इच्छा राहत नाही. परस्पर संवादाची ऑनलाइन क्षमता आणि वास्तवातील क्षमता यात वेगाने फरक पडत आहे. वास्तवातील संवादापेक्षा ऑनलाइन संवादावर भर वाढत आहे. वास्तवातील संवादाची क्षमता अत्यंत क्षीण बनत आहे. 'प्रोफाइल इमेज'च्या नादात उसने घेतलेले विचार आपलेच म्हणून स्वतःवर लादण्याने व्यक्तिमत्त्वाचा संकोच होत आहे. सध्यातरी हे माध्यम नवीन आणि कोरे करकरीत आहे. त्यामुळे, या प्रकारच्या समस्यांवर मार्ग काढण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही. त्याहून गंभीर बाब म्हणजे अशा समस्या तयार होताहेत, याची जाणीवच कमी आहे. त्यामुळे समस्येवरचा मार्ग हा खूपच लांबचा विषय. कोणतेही माध्यम विचारांवर, तर्कशक्तीवर, बुद्धीवर परिणाम करते. इंटरनेटही त्याला अपवाद नाही. शिवाय ते तंत्रज्ञानावर आधारित माध्यम. परिणामी, या माध्यमातून निर्माण होणारे मानसिक प्रश्न गुंतागुंतीचे असू शकतात. त्याचा अभ्यास असणारे तज्ज्ञही सध्या नाहीत. 'रिअल लाइफ'मधील समस्यांवर आपण उपाय शोधले आहेत; 'व्हर्च्युअल लाइफ'मधील नव्हे. आता, वेळ आली आहे ती उपाय शोधण्याची...

वर रंगली चर्चा
'सकाळ'ची ऑर्कुटवर 'मुक्तपीठ' कम्युनिटी आहे. या कम्युनिटीवर चर्चेसाठी हा विषय घेतला, तेव्हा अनेकानेक उत्तरं पुढे आली. 'आम्ही गंमत म्हणून वेगळी प्रोफाइल करतो...,' इथंपासून ते 'मुलगी म्हणून मी खरे फोटो वापरले, तर नको त्या गोष्टींना सामोरं जावं लागतं,' इथपर्यंतची खुली उत्तरं कम्युनिटीच्या सदस्यांनी दिली. 'खरी माहिती वापरण्याचा आग्रह कशासाठी बुवा', असा प्रश्‍नही अनेकांच्या समोर आहे.

या कम्युनिटीवरील चर्चेत काहींनी मांडलेले मुद्दे :
कल्पी : व्यक्तिगतरीत्या भावनिक स्तरावर गुंतणे फार धोक्‍याचे आहे. युवा पिढी भावनिक पातळीवर गुंतताना पाहिलीय.


भूषण : कॉलेज तरुणांच्या घोळक्‍यातही एखादाच बॉस असतो. बाकी सगळे अव्यक्त. हा कोंडमारा कुठेतरी फुटला पाहिजे की नाही? कोंडमारा न फुटलेले तुमचे-आमचे आई-बाबा तीस-तीस वर्षे नाकासमोर चालत राहून संसार करतात... आजच्या तरुणांसमोर पर्याय आहे...

समीर जोशी : मी थोडे दिवस नेट वापरणं बंद केलं. योग सुरू केला. त्यामुळं मन स्थिर आणि शांत राहतं. काही दिवसांनी नेट वापरणं पुन्हा सुरू केलं, तेव्हा मनाशी पक्कं ठरवलं की आता जास्त गुंतायचं नाही.

शैलजा : ऑर्कुट कम्युनिटीज्‌वरील माझ्या कविता आवडल्या लोकांना. मग डोक्‍यात हवा गेली. नुकतीच एका साहित्य कार्यक्रमाला गेले, तेव्हा आश्‍चर्य वाटलं... लोकांना माझं नाव माहीत नव्हतं. कसं असेल? मी ऑर्कुटच्या विश्वातून बाहेर पडून त्यांच्या संपर्कात कधी गेलेच नव्हते.

शीतल : आनंद घेणे याचा अर्थ हा नक्कीच नाही, की कोणाला फसवून इथं नको ते करणं. जे इथं आम्ही वागतो-बोलतो त्याची पूर्ण जाणीव घरी असते.
ऑर्कुट कम्युनिटीचा पत्ता
-
http://www.orkut.co.in/Main#Community?cmm=19343644


इंटरनेटवर फसव्या प्रोफाइल्सद्वारे फसवणूक करण्याचे आणि फसविले जाण्याचे प्रकार घडतात. बडेजाव मारण्यापासून ते धमक्‍या, शिवीगाळ करण्यापर्यंतचा समावेश यात होतो. 'मी फसवणुकीची शिकार ठरतोय का?' किंवा 'मी कुणाची फसवणूक करणारा शिकारी बनतोय का?' हे तपासून पाहा.

मी आहे का शिकार?

- विशिष्ट ई-मेल, इन्स्टंट मेसेज (चॅट) किंवा टेक्‍स्ट मेसेज पाहून डोकं सटकतंय?
- कॉम्प्युटर वापरल्यानंतर अस्वस्थ वाटतंय?
- घराबाहेर पडायला किंवा शाळेत जायला नकार येतोय?
- कुटुंबात किंवा मित्र-मैत्रिणींमध्ये मिसळायला नकोसे वाटतेय?
यापैकी काही घडत असलं, तर हा 'ऑनलाइन' छळवादाची शिकार बनण्याचा प्रकार असू शकतो.

मी आहे का शिकारी?
- शेजारून कोणी गेलं, तरी झटकन कॉम्प्युटरचे स्क्रीन, प्रोग्रॅम्स बदलले जाताहेत?
- रात्री उशिरापर्यंत कॉम्प्युटरवर 'काम' चालतंय?
- कॉम्प्युटर वापरायला मिळाला नाही, तर खूप अस्वस्थता येतेय?
- वेगवेगळ्या नावांनी ऑनलाइन अकाउंट्‌स आहेत किंवा दुसऱ्याचीच अकाउंट्‌स वापरली जाताहेत?
यापैकी काही घडत असलं, तर हा 'ऑनलाइन' छळवाद करणारा शिकारी बनण्याचा प्रकार असू शकतो.

होऊ शकतं छान ब्राऊजिंग... त्यासाठी...
या घडीला इंटरनेटसारखा माहितीचा स्रोत जगात दुसरा नाही. या माध्यमापासून दूर राहणं हे साक्षात अज्ञानाला निमंत्रण. त्यामुळे हे माध्यम वापरलंच पाहिजे. सोशल नेटवर्किंग वेबसाईट्‌सच्या माध्यमून मैत्र विस्तारलंच पाहिजे. त्यासाठी 'मी' आणि 'आई-बाबां'नी नेमकं काय करायला हवं?

मी
  • मी सोशल नेटवर्किंगच्या कोणत्या साईट्‌सवर आहे, हे आई-बाबांना दाखवेन
  • मी व्यक्तिगत माहिती कशी सुरक्षित ठेवतेय/ठेवतोय हे आई-बाबांना दाखवेन
  • मी या साईट्‌स कशा वापरायच्या, हे आई-बाबांना दाखवेन
  • माझ्या फ्रेंड्‌स लिस्टमध्ये कोण कोण आहे, हे आई-बाबांना दाखवेन
  • कधी अचानक आई-बाबा शेजारी आल्यास मी साईट्‌स/चॅट्‌स लपवणार नाही
  • कोणत्या नावाने मी साईट्‌स वापरतेय/वापरतोय, हे आई-बाबांना दाखवेन

आई-बाबा
  • इंटरनेट वापरण्यासाठी मुलाला/मुलीला पुरेसा वेळ जरूर देईन
  • कोणती माहिती जगजाहीर करू नये, याची कल्पना मुलाला/मुलीला देईन
  • इंटरनेटवर कोणतीच गोष्ट लपून राहात नाही, याची कल्पना मुलाला/मुलीला देईन
  • अनोळखी लोकांनी मैत्री करताना कोणती दक्षता घ्यायची, याची कल्पना मुलाला/मुलीला देईन
  • खासगी माहिती कितपत शेअर करायची, याची कल्पना मुलाला/मुलीला देईन
  • फोटो, फोन नंबर्स कुणाला द्यावेत, याविषयी आपला अनुभव कल्पना मुलाशी/मुलीशी शेअर करेन

जगातील संशोधन सांगते...
युरोपात इंटरनेटवर पौगंडावस्थेतील (टीनेजर्स) मुले-मुली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू पाहताहेत. वेगवेगळ्या ओळखी निर्माण करून चाचपणी करताहेत. त्यासाठी ते जोखीमही पत्करताहेत. ही जोखीम आहे खासगी माहिती खुली करण्याची. गैरसमज होण्याची. अयोग्य वर्तणुकीला सामोरे जावे लागण्याची.
  • अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील द बर्कमन सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीसाठी काम करणाऱ्या डाना बॉयड्‌ यांनी म्हटले आहे, की टीनेजर्स ओळख लपविण्यासाठी नाव, वय आणि स्थळाची माहिती जाणीवपूर्वक खोटी भरतात. अमेरिकेत याबद्दल आहे दुहेरी स्थिती. आपल्या मुलांचा अनोळखी व्यक्तींपासून बचाव करण्यासाठी मुलांच्या या खोटेपणाचे पालक समर्थन करतात, तर दुसरीकडे आपल्या पालकांचीच नजर चुकविण्यासाठी मुलेही अशी खोटी माहिती भरतात.
  • इंग्लंडमध्ये पन्नास टक्के मुलं-मुलीच खऱ्या माहितीच्या आधारे सोशल नेटवर्किंग वेबसाईट्‌स वापरतात, असं फ्युचर फाउंडेशन म्हणते.
  • आई-बाबांनी 'पोलिसगिरी' न करता मार्गदर्शक बनून सोशल नेटवर्किंग वेबसाईट्‌सवर सुरक्षितपणे मुला-मुलींना वावरण्यास शिकवले पाहिजे, असं अमेरिकेतील संशोधक म्हणतात. (भारताबाबत यापेक्षा वेगळी भूमिका आवश्‍यक; कारण गेल्या पाच वर्षांत सोशल नेटवर्किंग वेबसाईट्‌सवर अवतरलेल्या तरुणाईचे पालक या एकूणच प्रकाराबाबत निरक्षर. त्यामुळे पहिल्यांदा हा उद्योग शिकणे आणि नंतर मार्गदर्शन करणे, हे जास्त सयुक्तिक !)

फेसबूकवर भेटा http://www.facebook.com/samrat.phadnis
ट्विटरवर फॉलो करा http://twitter.com/samaphadnis


[ credit: images and information by samrat phadnis for esakal.com]
Related Posts Plugin for WordPress, Blogger...